कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येऊ नये ह्यासाठी १० साध्या सोप्या टिप्स!
कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येऊ नये ह्यासाठी १० साध्या सोप्या टिप्स!
आपल्या अवती भवती आपण अनेक असे लोक बघत असतो, जे अतिशय कठोर मनाचे असतात किंवा ते तसं असल्याचे भासवतात. अश्या लोकांवर कुठल्याही गोष्टीचा काहीही परिणाम होत नाही असंच आपल्याला वाटत असतं.
कोणी रडत असेल, कोणाला त्रास होत असेल तर अश्या व्यक्तींकडे बघून आपल्याला लगेच गहिवरल्यासारखं होतं, आपण भावूक होतो, पण काही कठोर लोकांवर याचा काहीही परिणाम होत नाही. पण कुठलीही व्यक्ती कितीही कठोर का असेना, जगात एक अशी वस्तू आहे जी त्याला रडवून सोडते. तो म्हणजे “कांदा”…
आठवलं की नाही, तुम्ही कांदा चिरत असाल किंवा घरात इतर कुणी कांदा चिरत असेल पण पाणी हे सर्वांच्याच डोळ्यात येते. नाही का?
कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते त्याचा थेट संबंध कांद्यातील घटकांशी आहे. कांद्यात काही गंधकयुक्त संयुगे असतात तशी काही एन्झाइमदेखील असतात. पण जोवर कांदा एकसंध असतो तोवर ही संयुगे आणि एन्झाइम्स परस्परांपासून अंतर ठेवून असतात.
पण कांदा कापला गेला की त्या संयुगांचे रुपांतर अॅसिडमध्ये होते आणि एन्झाइम अॅसिडचे रुपांतर गंधकयुक्त ऑक्साईडमध्ये होते. हे रसायन बाष्पनशील असते त्यामुळे त्याचे रुपांतर वायूत होऊन ते थेट डोळ्यात शिरते. तेथे त्याची प्रक्रिया डोळ्यातील अश्रुंमधील पाण्याशी होते आणि त्याचे रुपांतर सलफ्युरिक अॅसिडमध्ये होते. हे अॅसिड डोळे चुरचूरण्यास कारणीभूत असते. ही चुरचूर सुरु झाली की डोळ्यात आणखी अश्रूंची निर्मिती होऊ लागते.
कांदा जमिनीत वाढतो तिथून तो आजुबाजुचं बरंचसं गंधक शोषून घेतो त्याचं रुपांतर सल्फोक्साईड वगैरे मध्ये होतं. कांद्यामध्ये अलिल प्रोपिल डायसल्फाईड (Allyl propyl disulphide) हे गंधकयुक्त रसायन किंवा एन्झायिम तयार होतं, कांदा कापला की त्यात अनेक बदल होतात. त्याची वाफ हवेत मिसळत थेट तुमच्या तोंडाच्या-डोळ्याच्या दिशेने येते, त्यामुळेच कांदा कापताना डोळे चुरचूर करतात किंवा डोळ्यात पाणी येतं आणि आपण रडायला लागतो.
कांद्यामुळे डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून काही खास टिप्स :
१. कांदा कापण्यापूर्वी २०-२५ मिनिटे तो फ्रिजरमध्ये ठेवला तर त्याचा चुरचुरीतपणा कमी होतो.
२. असा कांदा कापताना त्याचा वरचा पापुद्रा हळुवार काढून टाकावा, कांद्याचा वरचा भाग कापला तर चालतो पण पातीकडील भाग कापू नका म्हणजे सर्वात शेवटी कापा, कारण या भागातच तुम्हाला रडवणारा घटक सर्वात जास्त असतो.
३. शक्य असेल तर वाहत्या पाण्याखाली काळजीपूर्वक कांदा कापला तरी त्याचा चुरचुरपणा कमी होतो.
४. चांगली धार असलेला चाकू वापरा त्यामुळे हे जे काही त्याचा चुरचुरणारं रसायन आहे, त्याला फार डिस्टर्ब होत नाही, ते आपल्या जागेवरच राहतं आणि त्याचा चुरचुरपणा कमी होतो.
५. कांदा कापल्यानंतर जर तो काही वेळानंतर वापरायचा असेल तर त्याला वाटीभर थंड पाण्यात टाकून ठेवा म्हणजे त्याचा वास किंवा चव बिघडणार नाही.
६. कांद्याचा वरचा पापुद्रा हळुवार काढा, आपल्या डोक्यावर ठेवा आणि त्याच स्थितीत कांदा कापा, बघा डोळ्यात पाणी येतंय का?
७. जर घाई असेल कापलेल्या कांद्याचे तुकडे पाण्यात टाका. त्यामुळे कांदा कापताना डोळ्यात पाणी येणार नाही.
८. ज्या ठिकाणी कांदा कापत आहात त्या ठिकाणी मेणबत्ती अथवा लँप लावा.
९. कांदा कापताना पंखा बंद करा. यामुळे कांदा कापताना डोळ्यांना अधिक त्रास होणार नाही.
१०. कांदा कापतना तोंडात ब्रेडचा तुकडा ठेवा.
Comments
Post a Comment