हेल्दी राहायचंय? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

हेल्दी राहायचंय? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

आरोग्य
कधी एखाद्या गोष्टीत अपयश आलं म्हणून तर कधी आपल्या मनाप्रमाणे घटना घडत नाहीत म्हणून आपण अस्वस्थ असतो. दिर्घकाळ अस्वस्थता कायम राहीली की निराशा येते. यामुळे आपण आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या घटनांचाही आनंद चांगल्या पद्धतीने घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत भिती वाटणे, चिडचिड होणे, अस्वस्थ होणे असे परिणाम दिसून येतात. मात्र यावर वेळीच काही उपाय केल्यास या परिस्थितीतून बाहेर येणे शक्य होते. याबरोबरच आपली बैठी जीवनशैली, अवेळी खाणे, जंकफूड, अपूरी झोप यांचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. पण या परिस्थितीतही स्वतःला फिट ठेवणे आवश्यक असते अन्यथा तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्या धोक्यात येऊ शकते. पाहूयात कोणत्या गोष्टी केल्यास आपले जीवन जास्त सुकर होईल…

आव्हाने स्विकारुन ती पूर्ण करा

आपल्यासमोर येणारे प्रत्येक नवीन काम हे एक प्रकारचे आव्हान असते. हे आव्हान स्विकारणे आणि त्यासाठी स्वत:ला सिद्ध करणे ही एक अतिशय उत्तम अशी प्रक्रिया आहे. पण ते विशिष्ट काम आपल्याला जमेल याबाबत विश्वास ठेवणे आणि ते करुन दाखवणे अतिशय महत्त्वाचे असून स्वतःला सिद्ध करणे महत्त्वाचे आहे. हे करताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही याची काळजी घ्या.

सतत धावत राहू नका

आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकदा आपण स्वत:ला पुरेसा वेळ देत नाही. घरातील गोष्टी, प्रवास, ऑफीसला जाण्याची घाई, इतर जबाबदाऱ्या यांमुळे आपण नुसते धावत राहतो. मात्र अशाप्रकारे सतत धावत राहिल्याने आपण मनाची शांतता हरवून बसतो. अशा परिस्थितीत अनेकदा आपले जेवण नीट होत नाही किंवा झोप अपूरी होते. त्याचा शरीरावर आणि मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे रोजच्या धावपळीत स्वत:साठी पुरेसा वेळ देऊन ठराविक वेळेला आराम करणेही आवश्यक असते. त्यामुळे तुम्ही फ्रेश राहता.

सकारात्मक विचार करा

आपले विचार आपल्या मनावर आणि पर्यायाने आपल्या शरीरावर परिणाम करत असतात. सकारात्मक विचारांमुळे आपली कामे जास्त चांगल्या पद्धतीने होतात. यामुळे तुम्ही आनंदी राहण्यासही मदत होते. विशेष म्हणजे आपण आनंदी राहिलो तर आपल्या आजुबाजूचे वातावरणही नकळत सकारात्मक राहण्यास मदत होते. याचा आपल्या कामावर, एकूणच वैयक्तिक जीवनावर आणि आरोग्यावरही चांगला परिणाम होतो.

ताण घेऊ नका

आपल्याला कधी ऑफीसमधील गोष्टींचा, कधी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांमुळे तर कधी इतर गोष्टींमुळे ताण येत असतो. पण हा ताण दिर्घकाळ राहिल्याने आपली मानसिक स्थिती बिघडू शकते. त्यामुळे जास्त ताण घेणे टाळा, तसेच ताण आलाच तर तो लवकरात लवकर कमी होईल काळजी घ्या. यासाठी योगा, ध्यान, जवळच्या व्यक्तींशी गप्पा मारणे, छंद जोपासणे अशा गोष्टी करु शकता. याचा आनंदी राहण्यासाठी नक्कीच फायदा होतो.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?