म्हणून हिंदू नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते

म्हणून हिंदू नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते

गुढीपाडवा हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला हा दिवस सर्व प्रकारचे वैभव घेऊन आलेला आहे. हिंदू धर्मपंचांगाप्रमाणे आज नवीन वर्षाची सुरूवात होते. त्याचबरोबर, वसंत ऋतूची सुरूवात देखील आज होत असते. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिषीर या सहा ऋतूंपैकी वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा म्हणतात. इंग्रजी महिन्यांप्रमाणे जसे एक जानेवारीला कॅलेंडर बदलतात , तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू धर्मातील दिनदर्शिका म्हणजे पंचांग बदलले जाते. या पंचांगाचा विचार नुसता तारखेने न करता खगोलशास्त्राचा विचार आणि अभ्यास करून केला जातो. त्यामध्ये तिथी, वार, नक्षत्र, योग, करण या पाच अंगांचा विचार केला जातो. त्याचबरोबर, चंद्राचे राशीतील भ्रमण यांचा विचार देखील केला जातो. एकंदरीतच, या पंचांगामध्ये (दिनदर्शिकेमध्ये) खगोलीय घटनांचा विचार करून मांडणी केली जाते अशा या पंचांगाचे पूजन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजे, वर्षाच्या पहिल्या दिवशी केले जाते.

वसंत ऋतूमध्ये येणारा हा महत्त्वाचा दिवस देशभरामध्ये वेगवेगळया पद्धतीने व नावाने साजरा केला जातो. पुराण काळापासून ते आजपर्यंत या दिवसाचा मुहूर्त साधून अनेक चांगल्या गोष्टींची सुरूवात करण्यात आली आहे. सर्व ऋतूंमध्ये या वसंत ऋतूला विशेष महत्त्व आहे. आपल्या जीवनातील तारूण्य हे वसंत ऋतूप्रमाणे असते असा उल्लेख अनेक साहित्यिकांनी त्यांच्या लिखाणातून केलेला आहे. महर्षी वाल्मीकींनी या वसंत ऋतूला ऋतूंमध्ये महत्त्वाचे स्थान दिले आहे. भगवान श्री कृष्णाने देखील वसंत ऋतूला ऋतूनां कुसुमाकरः असा उल्लेख गीतेमध्ये केला आहे. निसर्ग तसा नेहमीच सुंदर असतो, मोहक असतो. परंतु, वसंत ऋतूचे एक विशेष आहे ते म्हणजे ग्रीष्म ऋतूची उष्णता वाढत असताना, शिषीर ऋतूचा गारवा कमी झालेला असताना, कुठल्याही प्रकारचे पर्जन्यमान नसताना वसंत ऋतूमध्ये सृष्टीचे सौंदर्य खुलत जाते. निसर्गाच्या माध्यमातून सृष्टी जणू आपल्याशी संवाद साधत असते. जणू भगवंतांच्या चैतन्यदायी स्पर्शाने सृष्टी फुलून निघते. सर्व प्रकारच्या वनस्पती आपला बहर कुठलाही अहंकार न ठेवता सृष्टीला जणू बहाल करीत असतात. एकंदरीतच गुढीपाडव्यापासून सुरू होणारा हा ऋतू चैतन्य, आनंद, उत्साह, सृष्टी सौदर्य मनमुराद, मुक्तहस्ताने आपणास देत असतो. निराशेने ग्रासलेल्या आपल्या या जीवनाला हा गुढीपाडवा यशस्वी जीवन जगण्याची आशा निर्माण करून देतो.

शालीवाहन शकापासून हा सण साजरा होतो याचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. विशेष महत्त्वाची कामे, नवीन कामांची सुरूवात करणे यासाठी गुढीपाडवा महत्त्वाचा आहे. शेतातील सर्व कामे पूर्ण करून सुगीचा हंगाम संपल्यानंतर आपल्या धनधान्यांची पुजा करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असतो. निसर्गामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली आणि आयुर्वेदातील प्राकृतिक गुण असलेली कडुलिंबाची कोवळी फुले गुळामध्ये कालवून आज नैवेद्य म्हणून ग्रहण करतात, आरोग्य आणि चैतन्य आपल्या घरात सदैव नांदत रहावे यासाठी आपल्या घरासमोर गुढी उभारली जाते असा हा गुढी पाडवा सर्वांसाठी विशेष महत्त्वाचा असतो.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

📱Tech Knowledge : स्मार्टफोनमधील किरणोत्सर्गामुळे गर्भपाताचा धोका...