दि. ५ मे : जागतिक व्यंगचित्रकार दिन

मुंबई, दि. 5 - आज जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे. अनेकदा शब्दांमधून मांडण्याचा प्रयत्न करुनही ज्या गोष्टी व्यक्त होत नाहीत, अशा गोष्टी एका व्यंगचित्रातून सहजपणे मांडता येतात. कारण, चित्राच्या एका रेषेत हजारो शब्दांचा ऐवज सामावलेला असतो. व्यंगचित्र हा वर्तमानपत्राचा तर आत्मा आहे, अविभाज्य घटक आहे. व्यंगचित्रकार या पेशाला आर.के. लक्ष्मण यांनी ओळखच नव्हे, तर प्रतिष्ठा मिळवून दिली. जागतिक व्यंगचित्रकार दिनाच्या निमित्ताने भारतातील प्रसिद्द 10 व्यंगचित्रकारांबद्दल जाणून घेऊयात.

 

1) आर के लक्ष्मण - कॉमन मॅन

सुप्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण यांना आर. के. लक्ष्मण याच नावाने सर्वजण ओळखतात. टाईम्स ऑफ इंडियामधील 'यू सेड इट' नावाने फक्त व्यंगचित्र असलेले सुरु केलेल सदर आणि 'कॉमन मॅन'ने त्यांना अजरामर केलं. मुंबईमधील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌स येथे शिकण्यासाठी लक्ष्मण यांनी अर्ज केला होता, पण तेथे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. मग त्यांनी म्हैसूरच्या विद्यापीठातून बीए ची पदवी संपादन केली. हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राने लक्ष्मण यांचे वय कमी असल्याचे कारण पुढे करून नोकरी नाकारली. मग काही काळ ब्लिट्झ मध्ये आणि नंतर फ्री प्रेस जर्नल मध्ये लक्ष्मण यांनी काम केले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे देखील तेथेच काम करीत असत. आर. के. लक्ष्मण यांचा पद्मभूषण(१९७१), पद्मविभूषण (२००५), रॅमन मॅगसेसे पुरस्काराने (१९८४) सन्मानित करण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी जोडले गेल्यानंतर आर के लक्ष्मण यांना ख-या अर्थाने वाव मिळाला आणि त्यांचे वेगवेगळे पैलू समोर आले. सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांच्यावर ब्रिटिश कार्टूनिस्ट डेविड यांचा खूप प्रभाव होता. ३० ऑगस्ट २००३ रोजी सकाळी ८ वाजता आर. के. लक्ष्मण यांना पक्षघाताचा झटका आला आणि त्यांची डावी बाजू निकामी झाली. 20 जून 2010मध्ये त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना पुण्याला हलवण्यात आलं. ऑक्टोबर 2012 मध्ये त्यांनी आपला 91वा वाढदिवसदेखील साजरा केला. यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि जयंत नारळीकरदेखील उपस्थित होते. २६ जानेवारी २०१५ ला त्यांचं निधन झालं.

 

 2) शंकर - भारतीय व्यंगचित्रकारांचे पितामह

शंकर यांचा जन्म 31 जुलै 1902 मध्ये केरळमधील कायामकुलम येथे झाला. त्यांना भारती व्यंगचित्रकारांचं पितामह म्हटलं जातं. घरच्यांची इच्छा राखण्यासाठी शंकर यांनी 1927 मध्ये मुंबईतील लॉ कॉलेजमध्ये दाखला घेतला. मात्र शंकर यांचं मन लागत नसल्याने एकाच वर्षात त्यांनी शिक्षण सोडलं. त्यानंतर शंकर यांनी प्रसिद्ध उद्योजक नरोत्तम मोरारजी यांच्याकडे पीएची नोकरी स्किकारली. त्याचवेळी शंकर यांनी आपल्या कलेचा ख-या अर्थाने वापर करण्यास सुरुवात केली. द बॉम्बे क्रॉनिकल, द फ्री प्रेस जर्नल आणि द विकली हेराल्ड या वृत्तपत्रांना नियमितपणे व्यंगचित्र पाठवण्यास सुरुवात केली. 1932 मध्ये शंकर यांच्या आयुष्यात मोठं वळण आले जेव्हा हिंदुस्तान टाईम्सचे संपादक जोसेफ यांनी त्यांना नोकरीची ऑफर दिली. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या आवडत्या व्यंगचित्रकारांमध्ये शंकर यांचा पहिला क्रमांक होता. जेव्हा कधी जवाहरलाल नेहरु यांचं व्यंगचित्र काढलं जायचं जवाहरलाल नेहरु खुल्या मनाने त्याची स्तुती करत. 1946 मध्ये शंकर यांनी नोकरी सोडल्यावर आपला राजकारणावर आधारित पहिला जर्नल 'शंकर्स विकली' सुरु केले. शंकर यांचा पद्मभुषण, पद्मविभुषण सहित अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांना गौरव करण्यात आला आहे. 26 डिेसेंबर 1989 ला वयाच्या 87व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

 

3) बाळासाहेब ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील झंझावती नाव म्हणजे बाळासाहेब ठाकरे. मात्र ते एक व्यंगचित्रकार म्हणून देखील प्रसिद्ध होते. 23 जानेवारी 1926 ला बाळासाहेबांचा जन्म झाला. बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापनादेखील केली आहे. राजकारणात येण्याअगोदर बाळासाहेब ठाकरे फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मणदेखील काम करत होते. बाळासाहेब भाषणादरम्यान करणा-या टिप्पणीतून, वन लाईनर आणि गंमतीतून त्यांच्यातील व्यंगचित्रकार नेहमी समोर यायचा. 1960 मध्ये बाळासाहेबांनी 'मार्मिक' नावाचे स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) सुरुवात केले. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रामुळे मार्मिक सतत चर्चत असायचं. 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केल्यानंतर सामना वृत्तपत्र सुरु केलं. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत हे वृत्तपत्र सुरु करण्यात आलं. राजकारणात व्यस्त असल्याने बाळासाहेबांमधील व्यंगचित्रकार फार कमी वेळा पाहायला मिळायचा. 17 नोव्हेंबर 2012ला राजकारणातील एका मोठ्या नेत्यासोबत एका उत्कृष्ट व्यंगचित्रकाराला या जगाने निरोप दिला.

4) बी वी राममूर्ती

दक्षिण भारतातील पॉकेट कार्टूनचे जनक म्हणून बी वी राममूर्ती यांना ओळखले जाते. राममूर्ती यांचा 'मि. सिटीजन' गेली 33 वर्ष लोकांच्या ह्रद्यावर राज्य करत आहे. डेक्कन हेराल्ड, प्रजावाणी, सुधा आणि मयुराच्या वाचकांचा दिवस 'मि. सिटीजन' च्या दैनंदिन समस्या, गंमत यांच्याशी जोडल्या गेलेल्या ह्दयाला स्पर्शून जाणा-या गोष्टींशिवाय होत नाही आहे. राममूर्ती यांची लोकप्रियता इतकी प्रचंड आहे की एकदा त्यांनी त्यांच्या मुख्य भुमिकेच्या कार्टूनचा फेटा काढून त्याला टक्कल दाखवलं होतं, त्यानंतर वाचकांची हजारोच्या संख्येने पत्रं आली. शेवटी राममूर्ती यांना पुन्हा फेटा वापरावा लागला. अमेरिकेचे पुर्व राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्यावर बनवण्यात आलेल्या व्यंगचित्राला 'ग्रीन ऑफ द इअर' पुरस्काराने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली.

 

5) मारिओ मिरांडा

1998 मध्ये पद्मश्री आणि 2002 मध्ये पद्मभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले मारिओ मिरांडा यांना दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू सोसाटींमधील जीवन तसंच गोव्यातील जीवनशैली व्यंगचित्रांद्वारे जिवंत करण्यासाठी ओळखलं जातं. गोव्यावर निरतिशय प्रेम करणारे मारिओ तसे जन्माने गोवेकर नव्हेत. त्यांचा जन्म दमणचा. त्यांची आईही दमणची होती, परंतु वडील गोव्याचे खानदानी भाटकार. मारिओंच्या रेखाचित्रांमधून गोव्याचा गतकाल प्रामुख्याने प्रकटत असे. द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, टाईम्स ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक टाईम्समध्ये छापून येणा-या त्यांच्या व्यंगचित्रांनी वाचकांच्या मनावर अनेक वर्ष अधिराज्य केलं. भारतातल्या जवळजवळ सर्व प्रमुख आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकारांचे व्यंगचित्रांचे माध्यम ब्रश आणि शाई हेच होते. त्या पार्श्वभूमीवर मारिओ मिरांडाची टाक आणि शाईने काढलेली चित्रे एकदम वेगळी आणि नजरेत भरणारी होती. मारिओच्या टाकातून उतरलेली चित्रे ठोस, रेखीव आणि कोरीव असत. 1926 ला जन्म झालेल्या मिरांडा यांचं 11 डिसेंबर 2011मध्ये गोव्यात 85व्या वर्षी निधन झालं.

 

6) सुधीर तैलंग

26 फेब्रुवारी 160 मध्ये बिकानेरमध्ये जन्मलेल्या सुधीर तैलंग हिंदी व्यंगचित्र जगतातील एक मोठं नाव आहे. 1970 मध्ये तैलंग यांनी पहिलं व्यंगचित्र काढलं होतं. 1982 मध्ये त्यांनी इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया मुंबईमधून आपल्या करिअरला सुरुवात केली. लगेच पुढच्याच वर्षी त्यांनी नवभारत टाईम्सची नोकरी स्विकारली. सुधीर तैलंग यांनी प्रसारमाध्यमांद्वारेदेखील प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. शिक्षा आणि साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी 2004मध्ये तैलंग यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 6 फेब्रुवारी 2016मध्ये कॅन्सरमुळे त्यांचं निधन झालं. त्यांच वय फक्त 55 वर्ष होतं. त्यांच्या जाण्याने भारतीय व्यंगचित्र जगताच खुप मोठं नुकसान झालं.

 

7) वी टी थॉमस

केरळमध्ये 40 वर्ष घरातील छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या ह्द्यावर वी टी थॉमस यांनी राज्य केलं होतं. थॉमस यांना 12 वर्षाच्या बहिण भावाची जोडी 'बोबन आणि मॉली' यांच्या गमतीदार मस्तीखोर खोड्यांमुळे खुप पसंद केलं जायचं. 1961 मध्ये मलयाला मनोरमामधून करिअरला सुरुवात करणा-या थॉमस यांनी शेवटपर्यंत तिथेच काम केलं. थॉमस यांचं कार्टून मलयाला मनोरमा साप्ताहिकाच्या शेवटच्या पानाची शान समजली जायची.

 

8) एन के रंगनाथन उर्फ रंगा

जगभरातील सेलिब्रेटीजचे स्वाक्षरी असणा-या व्यंगचित्रांचा रेकॉर्ड केला असल्याने लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंद असलेले एन के रंगनाथन यांना रंगा या नावानेदेखील ओळखलं जातं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एन के रंगनाथन यांनी जास्त व्यंगचित्र आकाशवाणीमध्ये मुलाखतीदरम्यान काढली आहेत. एकदा रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना आपलं व्यंगचित्र इतकं आवडलं की ते आपल्यासोबत घेऊन गेले. त्यानंतर रंगनाथन यांनी नेहमी दोन व्यंगचित्र काढण्यास सुरुवात केली. एक ते पाहुण्यांना देत आणि दुसरं आपल्याकडे ठेवत असत. व्यंगचित्र काढण्याचा त्यांचा वेग इतका होता की एक व्यंगचित्र काढायला लागणा-या वेळेत त्यांची दोन व्यंगचित्र पुर्ण व्हायची. दोन वेळा तर त्यांनी काढलेलं व्यंगचित्र सेलिब्रेटीजना आवडली नाहीत. ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यानंतर रंगनाथन यांनी त्यात काही बदल केले त्यानंतर मार्गोरेट यांनी स्वाक्षरी केली. दुस-या घटनेत प्रिंस चार्ल्स यांना रंगनाथन यांनी आपल्यावर अन्याय केला असं वाटलं. त्यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. एका घटनेत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी स्वाक्षरी केली पण व्यंगचित्र खराब असल्याचं म्हटलं होतं.रंगनाथन यांनी द स्टेट्समॅन, इंडियन एक्स्प्रेस आणि द ट्रिब्यून या वृत्तपत्रांमध्ये चार दशकांमध्येही जास्त काळ काम केलं. 28 जुलै 2002 मध्ये ह्रद्यविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.

 

9) माया कामथ

पुरुषांचं वर्चस्व असणा-या या क्षेत्रात माया कामत यांचं नावदेखील सन्मानपुर्वक घेतलं जातं. माया यांचा जन्म 1951 मध्ये मुंबईत झाला. त्यांनी इंग्लिश साहित्यात एम ए पदवी घेतली मात्र तरीही व्यंगचित्रकार होण्याची त्यांची ओढ संपली नव्हती. लिन जॉनस्टन यांचं पुस्तक 'फॉर बेटर ऑर फॉर वर्स' मधील चित्रांमुळे त्यांच्या आयुष्याला वळण मिळालं. त्यानंतर त्यांनी व्यंगचित्रांच्या दुनियेत प्रवेश केला. द इव्हिनिंग हेराल्डमधील कार्टून स्ट्रिप 'गीता'सोबत 1985 त्यांनी व्यंगचित्रकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. 1986 मध्ये त्यांनी द इंडियन एक्स्प्रेसच्या बंगळुरु संस्करणसाठी पॉकेट कार्टून बनवण्यास सुरुवात केली. दैनंदिन आयुष्यावरील त्यांची व्यंगचित्र द इंडिपेंडंट, द फ्री प्रेस जर्नल, मिड डे, न्यूज डे मध्ये दरदिवशी येऊ लागली. 1997 मध्ये एशिअर एजचं प्रकाशन बंगळुरुतून होण्यास सुरुवात झाली तेव्हा माया यांना ख-या अर्थाने भक्कम प्लॅठफॉर्म मिळाल. पण दुर्देवाने याचवेळी कॅन्समुळे त्यांचा मृत्यू झाला.

 

10) हरीश चंद्र शुक्ला उर्फ काक

हरीश चंद्र शुक्ला उर्फ काक यांनी हिंदी वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपली व्यंगचित्र लोकांपर्यंत पोहोचवली आणि हिंदी भाषिकांच्या ह्रद्यावर राज्य केलं. महत्वाचं म्हणजे त्यांनी फक्त हिंदी भाषेतच काम केलं. जनसत्ता, नवभात टाइम्स, दैनिक जागरण, राजस्थान पत्रिका या वृत्तपत्रांना काक यांच्या व्यंगचित्राने वेगळी ओळख देण्याचं काम केलं आहे. स्थानिक विषयापासून ते आंतरराष्ट्रीय विषयापर्यंत सर्व गोष्टींवर काक भाष्य करायचे. राजकीय विषयावर काक यांची पकड खुपच घट्ट होती. त्यांच्या व्यंगचित्रामुळे अनेकदा बातमी देण्याची गरजही लागायची नाही. 1986 मध्ये माजी लोकसभा अध्यक्ष बलराम जाखड यांनी काक यांचं कौतुक करताना मी फक्त 500 सदस्य असणा-या लोकसभेचा स्पीकर आहे पण काक लाखो लोक सदस्य असणा-या लोकसभेचे स्पीकर आहेत असं म्हटलं होतं.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?