कारगिल विजय दिन विशेष : एका मेंढपाळामुळे भारतानं पाकला धूळ चारली, कसं घडलं कारगिल युद्ध जाणून घेण्यासाठी वाचा..!

कारगिल विजय दिन विशेष : एका मेंढपाळामुळे भारतानं पाकला धूळ चारली, कसं घडलं कारगिल युद्ध जाणून घेण्यासाठी वाचा..!

आज 26 जुलै.. बरोबर 22 वर्षांपूर्वी म्हणजे 26 जुलै 1999 मध्ये भारताने कारगिल युद्धात पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केलं होतं. तेव्हापासून दरवर्षी 26 जुलै हा दिवस ‘कारगील विजयी दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
जम्मू-काश्मिरमधील कारगिलमध्ये कडाक्याच्या थंडीत दोन महिने चाललेल्या युद्धात भारतीय जवानांनी शौर्याची परिभाषाच बदलली. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, असे काम केले. कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने हे युद्ध कसे झाले, त्यात आपण कशी बाजी मारली, त्यात एका मेंढपाळाची भूमिका किती महत्वाची ठरली, याबाबतचा घेतलेला मागोवा..
कारगील हे तसे छोटे शहर. जम्मू-काश्मिरची राजधानी असलेल्या श्रीनगरपासून २०५ किलोमीटरवर. पाकव्याप्त काश्मिरच्या नियंत्रणरेषेपासून अगदी जवळ. एकीकडे भारतासोबत शांततेच्या वाटाघाटी चालू असताना, धूर्त पाकिस्तानने कावा साधला.
पाकिस्तानच्या 5 हजारांहून अधिक सैनिकांनी गुप्त पद्धतीने भारतात घुसखोरी केली. पाकिस्तानी सैनिक भारतात घुसखोरी करीत असल्याचे एका मेंढपाळाने पाहिले होते. त्याने ही माहिती भारतीय सैन्याला दिली आणि भारतीय सैनिक सतर्क झाले.
मेंढपाळाने दिलेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी सैन्याची एक तुकडी पर्वतापलीकडे गेली असता, पाक सैन्याची तयारी पाहून भारतीय जवानांना धक्काच बसला.
पाक सैन्याने भारताचा खूप मोठा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला होता. सियाचिन, ग्लेशियरचा प्रदेश ताब्यात घेण्याचा त्यांचा मनसुबा होता; वेळीच ही बाब एका मेंढपाळाने भारतीय सैन्याच्या लक्षात आणून दिल्याने पाकचा मोठा डाव लक्षात आला.
भारतीय सैन्याने भारत सरकारला पाक सैनिकांनी घुसखोरी केल्याची माहिती दिली. त्यानंतर पाकला सडतोड उत्तर देण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन विजय’ची घोषणा केली; पण हे ऑपरेशन वाटते तितके सोपे नव्हते. पाक सैनिक पर्वतावर, तर भारतीय सैन्य खालच्या बाजूने लढत होते. त्यामुळे लक्ष्य भेदण्यात अनेक अडचणी येत होत्या.
पाकिस्तानने 3 मे 1999 रोजी युद्धाला सुरूवात केली. 18 हजार फूट उंचीवर हे युद्ध लढले गेले. भारतीय सैन्याने हार न मानता सलग दोन महिने निकराने लढा देत, पाकिस्तानचे दात त्यांच्याच घशात घातले. प्रतिकुल परिस्थिती असतानाही भारताने पाकला धूळ चारली.

बोफोर्स तोफांनी बाजी पलटली
3 मे रोजी युद्धाची ठिणगी पडल्यावर भारत सरकारने तातडीने भारतीय सैन्याला बोफोर्स तोफा पुरविल्या नि नंतर खऱ्या अर्थानं बाजी पलटली. बोफोर्स तोफांच्या मदतीने पाकिस्तानी बंकर टार्गेट करण्यात आले. पाकिस्तानला या प्रतिहल्ल्यापासून सावरताच आले नाही.
26 जुलै 1999 रोजी भारताने हरलेली बाजी जिंकली. पाकिस्तानला तिसऱ्यांदा धूळ चारली. कारगिल युद्धात भारताचे जवळपास 527 जवान शहीद झाले, तर 1300 हून अधिक जवान जखमी झाले. त्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी, या दिवसाची आठवण म्हणून आज ‘कारगील विजयी दिवस’ साजरा केला जातो.

माहिती संकलन
श्री. स्वप्निल भिवाजी आव्हाड,
सिन्नर - नाशिक

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?